मानोरा (जि. वाशिम) : (साप्ता.दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क) “शेतकरी हा देशाचा कणा आहे” असं म्हणत आपण नेहमी गौरव करतो. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेणारे प्रशासनाचे कान बहिरे झालेत का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. वाईगौळ (ता. मानोरा) येथील महिला शेतकरी सौ. रंजना विनोद वानखेडे यांच्यावर अशाच एका दुर्लक्षाच्या घटनेने संकट कोसळले आहे.
दिनांक १९ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता, त्यांच्या शेतातील वीज तारेला स्पर्श झाल्याने अचानक आग लागली. ही आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच गहू पिके, संत्र्याची झाडे, ठिबक सिंचन यंत्रणा आणि अन्य शेतमाल जळून खाक झाला. या आगीत त्यांचे सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
सर्वात दुःखद बाब म्हणजे, याबाबत वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही नुकसानभरपाई मिळालेली नाही, ना कुठल्याही अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे. त्यामुळे वानखेडे कुटुंबियांना पिकांसाठी पाणी देणे देखील शक्य झालेले नाही.
श्रीमती वानखेडे यांनी तहसीलदार, मंडळ अधिकारी तसेच वीज महावितरण विभागाकडे तक्रार अर्ज सादर केला असून, तात्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. अन्यथा प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे.
या दुर्घटनेने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. आता तरी प्रशासनाने जागे होऊन तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
--
No comments:
Post a Comment