Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Sunday, June 14, 2026

अडाण नदीत बुडून आतेभाऊ–मामेभाऊचा दुर्दैवी मृत्यू; इंझोरी गावावर शोककळा

मानोरा, दि. १४ जून :(साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) 
पवित्र अधिक महिन्यानिमित्त अडाण नदीत स्नान व पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी गोमुखेश्वर संस्थानजवळ घडली. या घटनेमुळे इंझोरीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांमध्ये शुभम अमोल धोंडे (वय १४, रा. इंझोरी) व दर्शन सुनील वावगे (वय २०, रा. भातकुली, जि. अमरावती) यांचा समावेश आहे. हे दोघे मामे–आतेभाऊ होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अधिक महिन्यानिमित्त अडाण नदीत स्नान करण्यासाठी आणि पोहण्यासाठी शुभम व दर्शन हे गोमुखेश्वर संस्थानजवळील नदीपात्रात गेले होते. पोहत असताना नदीतील खोलगट गड्ड्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात ओढले गेले व बुडू लागले.
नदीकाठावर खेळत असलेल्या काही मुलांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर नदीत मासेमारी करणारे स्थानिक कोळी बांधव व नागरिक घटनास्थळी धावले. त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर दोघांनाही पाण्याबाहेर काढण्यात आले.
दरम्यान, घटनेची माहिती गावात पसरताच नातेवाईक व ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेतली. गावातील युवक विशाल वानखेडे यांनी स्वतःच्या वाहनातून दोघांना तातडीने कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर दोघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. ही बातमी समजताच नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला.
कुटुंबाचा एकुलता एक दिवा विझला
मृत्यूमुखी पडलेला शुभम हा अमोल धोंडे यांचा एकुलता एक मुलगा होता. तो गेल्या वर्षभरापासून आळंदी येथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत होता. उन्हाळी सुट्टीसाठी तो काही दिवसांपूर्वीच गावी आला होता. सुट्टीसाठी घरी आलेल्या मुलाचा आणि नात्यातील तरुणाचा अशा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने धोंडे व वावगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण इंझोरी गावासह मानोरा तालुक्यात शोककळा पसरली असून, दोन्ही युवकांच्या अकाली निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

२०२३ पासून रखडलेली केंद्रप्रमुख भरती अखेर पूर्णत्वाकडे; राज्यभरात २४१० नवीन केंद्रप्रमुख लवकरच रुजू होणार!


दिग्रस : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या शैक्षणिक सक्षमीकरणासाठी आणि प्रशासकीय घडी बसवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली 'केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा' यशस्वीरित्या पार पडली असून, त्याचा निकालही जाहीर झाला आहे. या यशस्वी प्रक्रियेमुळे आता राज्यभरातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये २४१० नवीन केंद्रप्रमुख लवकरच प्रत्यक्ष सेवेत रुजू होणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे केंद्रप्रमुख भरतीची ही प्रक्रिया रखडलेली होती. केंद्रप्रमुख हे शाळा आणि प्रशासन यांमधील मुख्य दुवा म्हणून काम करतात. ही पदे रिक्त असल्याने अनेक शाळांच्या पर्यवेक्षणावर आणि शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत होता. मात्र, शासनाने सकारात्मक पाऊल उचलत परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने पूर्ण केली. याबद्दल सर्व स्तरांतून प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.

या विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे ३८ हजार शिक्षकांनी नोंदणी केली होती. प्राथमिक अंदाजानुसार, निवड प्रक्रियेनंतर आता प्रत्येक जिल्ह्यात गुणवत्तेनुसार केंद्रप्रमुखांची नियुक्ती केली जात आहे. यात सर्वाधिक १५१ जागा पुणे जिल्ह्यात तर सर्वात कमी ३० जागा भंडारा जिल्ह्यात भरल्या जात आहेत. 
राज्यातील सर्वाधिक पदे खालील ५ जिल्ह्यात भरली जात आहेत.
पुणे १५१
रत्नागिरी १२५
अहमदनगर १२३
नाशिक १२२
रायगड ११४

विदर्भात भरली जाणारी जिल्हानिहाय पदे: 
यवतमाळ ८९
अमरावती ६९
नागपूर ६८
चंद्रपूर ६६
बुलढाणा ६५
गडचिरोली ५०
वर्धा ४३
अकोला ४२
गोंदिया ४२
वाशीम ३५
भंडारा ३०

राज्यातील सर्व ३४ जिल्ह्यांमधील एकुण मंजूर पदांच्या अर्धी अर्थात २४१० रिक्त पदे भरली जात आहेत. ही पदे भरली जात असल्याने शिक्षकांची सुमारे अडीच हजार पदे रिक्त होणार आहेत. या रिक्त पदांचा समावेश पवित्र पोर्टलवर करुन राज्यातील अडीच हजार बेरोजगारांना शिक्षकाची नोकरी मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे सरकारी शाळेतील मुलांना नवीन केंद्रप्रमुखांसह नवीन शिक्षक सुद्धा लवकरच उपलब्ध होणार आहेत हे इथे उल्लेखनीय!

"राज्यातील शाळांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरणे आमचे प्राधान्य होते. ग्रामविकास आणि शिक्षण विभागाच्या समन्वयामुळे ही प्रक्रिया यशस्वी झाली आहे."
— शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य.

शाळांना मिळणार नवा गतीमान चेहरा
एक केंद्रप्रमुख साधारणपणे १३ ते १६ शाळांवर नियंत्रण आणि मार्गदर्शन ठेवतो. नवीन २४१० केंद्रप्रमुखांच्या नियुक्तीमुळे शासकीय व जिल्हा परिषद शाळांमधील अध्यापन पद्धती, प्रशासकीय कामे, आणि शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणांची (NEP) अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
रखडलेला पेच सोडवून ही परीक्षा वेळेत पूर्ण केल्याबद्दल राज्यभरातील शिक्षक संघटनांनीही मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि संपूर्ण प्रशासकीय टीमचे विशेष अभिनंदन केले आहे.

Saturday, June 13, 2026

मानोरा तालुक्यात खुले तेल विक्रीला ऊत; नियमांची पायमल्ली, प्रशासनाचे दुर्लक्ष?


मानोरा,  : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) तसेच शासनाच्या नियमांनुसार सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले असून ग्राहकांना केवळ सीलबंद पॅकबंद तेल विक्री करण्याचे निर्देश आहेत. मात्र मानोरा तालुक्यात अनेक किराणा दुकानांमध्ये आजही खुले तेल विक्री सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तालुक्यातील अनेक दुकानांमध्ये जुनाट डबे, टाक्या मध्ये खाद्यतेलाचा साठा करून ग्राहकांना मोजून तेल विकले जात असल्याची माहिती समोर येत आहे. अन्न सुरक्षा नियमांनुसार जुन्या डब्यांचा पुनर्वापर केल्यास तेलाची गुणवत्ता खालावण्याची शक्यता असून ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
तथापि, नियमांची सर्रास पायमल्ली होत असतानाही संबंधित यंत्रणा व प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. नागरिकांच्या मते, या प्रकाराकडे प्रशासनाने सोईस्कर दुर्लक्ष केल्यामुळे किराणा दुकानदारांकडून खुले तेल विक्रीचा व्यवसाय सुरूच आहे.
ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर विषय असून अन्न सुरक्षा विभागाने तातडीने तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच मानोरा तालुक्यातील सर्व किराणा दुकानांची तपासणी करून खाद्यतेलाची गुणवत्ता व साठवणुकीची स्थिती तपासण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
"ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड नको; खुले तेल विक्री थांबवा आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा," अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Friday, June 12, 2026

दिग्रस येथे ‘आरोग्य संकल्प अभियान’ अंतर्गत भव्य मोफत आरोग्य शिबिर. पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित आयोजन


दिग्रस: (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त ‘रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा’ या संकल्पनेतून दिग्रस येथे ‘आरोग्य संकल्प अभियान’ अंतर्गत भव्य मोफत रोगनिदान, शस्त्रक्रिया, उपचार व औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मा. आरोग्य सेवा समिती, यवतमाळ यांच्या वतीने तसेच दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, सावंगी (मेघे) आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर रविवारी, १४ जून २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत दिनबाई विद्यालय, दिग्रस येथे पार पडणार आहे.

या शिबिरात अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांकडून हृदयविकार, कर्करोग, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, अस्थिरोग, हृदयरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा विकार, श्वसनरोग, मानसिक आजार, न्यूरो विकार, दंत व मुखरोग तसेच मूत्ररोग आदी विविध आजारांची मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर (मेमोग्राफी) तपासणी, विविध प्रकारच्या कॅन्सरची तपासणी, पॅप स्मिअर चाचणी, बंध्यत्व तपासणी, व्हेरिकोज वेन्स तपासणी, किडनी तपासणी तसेच ईसीजीसह विविध आरोग्य चाचण्या करण्यात येणार आहेत.

शिबिरामध्ये तपासणीनंतर आवश्यकतेनुसार रुग्णांना पुढील उपचार, शस्त्रक्रिया व विशेष वैद्यकीय सेवांसाठी मार्गदर्शन केले जाणार असून अनेक उपचार आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासोबतच नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड काढण्याची सुविधाही शिबिरात उपलब्ध राहणार आहे. यासाठी लाभार्थींनी आधार कार्ड, रेशन कार्ड व आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

दिग्रस, दरव्हा आणि नेर विधानसभा मतदारसंघातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी हे शिबिर मोठा दिलासा ठरणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आरोग्य सुविधा सामान्य नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर परिसरातील नागरिकांसाठी वरदान ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Wednesday, June 10, 2026

मृत्यूचा सापळा ठरू शकणारी वीजवाहिनी; कारखेड्यात शेतकऱ्यांची भीती वाढली

कारखेडा, ता. मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) :
कारखेडा येथील सर्वे क्रमांक 30 मधील शेतातून गेलेली मुख्य वीजवाहिनी सध्या धोक्याच्या उंबरठ्यावर पोहोचली असून, तिचा आधार असलेला वीज खांब मोठ्या प्रमाणात झुकल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य दुर्घटनेची शक्यता लक्षात घेता तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
सदर शेताचे मालक कृष्णकुमार गजाननराव सोळंके असून, शेताची मशागत चंद्रकांत गजाननराव देशमुख करीत आहेत. शेतातील कामकाज सुरू असताना झुकलेल्या खांबामुळे मजूर, शेतकरी तसेच जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या मार्गाने महावितरणचे फिटर व लाईनमन नियमितपणे ये-जा करतात. त्यामुळे खांबाची धोकादायक स्थिती त्यांच्या निदर्शनास असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप होत आहे. अनेकदा तोंडी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार वारे किंवा मुसळधार पावसामुळे हा खांब कोसळल्यास मोठा अपघात घडू शकतो. त्यामुळे जीवित व वित्तहानी होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महावितरण प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी पाहणी करून झुकलेल्या खांबाची दुरुस्ती करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी करीत आहेत. "अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वी प्रतिबंध करणे आवश्यक आहे," अशी भावना परिसरातून व्यक्त होत आहे.

भूमिहीन शेतकरी पत्नीच्या खांद्यावरून उतरले जोखड...! लातूर जिल्ह्यातील बोंबळीच्या गायकवाड कुटुंबियांना मिळाला दिलासा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संवेदनशीलता, प्रशासनाची तत्परता. वीज पडून दगावलेला बैल, आर्थिक सहाय्यासह, शेतकऱ्याला मिळाला बैल

मुंबई, दि. १०: ( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
वीज पडून बैल दगावल्याने जोखडाला पत्नीला जुंपण्याची वेळ आलेल्या लातूर जिल्ह्यातील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या व्य़थेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली, अन् या शेतकरी कुटुंबाला अवघ्या काही तासात बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसान भरपाई पोटीची रक्कम मिळाली. यात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे निर्देश आणि जिल्हा प्रशासनासोबतच, अन्य विभागांनी दाखवलेली संवेदनशीलता चर्चेची ठरली आहे. या संवेदनशीलतेमुळे आता काशिनाथ गायकवाड यांना पत्नीला बैलाच्या जागी जूंपावे लागणार नसल्याने, या कष्टकरी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. 

लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्दचे काशिनाथ गायकवाड भूमिहीन शेतकरी. त्यांच्याकडे असलेल्या बैलजोडीच्या मदतीने श्री. गायकवाड व त्यांच्या पत्नी सौ. हौसाबाई परिसरातील शेतकऱ्यांची जमीन कसतात. मशागतीची, नांगरणी ते पेरणी, वखरणी अशी मिळेल ती कामे करतात, यावरच त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. यातच त्यांच्यावर दुर्दैव ओढवले. त्यांच्याकडील एका बैलाचा शुक्रवारी (५ जून) झालेल्या वादळी पावसात वीज पडून मृत्यू झाला. त्यामुळे मिळालेली कामे पूर्ण करण्यासाठी, श्री. गायकवाड यांना पत्नी सौ. हौसाबाई यांना जुंपावे लागल्याचे वृत्त मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यापर्यंत पोहचले. यावर त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. त्यानुसार प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संपर्कात राहून, लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांना महसूलसह, सर्व यंत्रणांना श्री. गायकवाड यांना तत्काळ मदत करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार तहसिल कार्यालयासह, पशूसंवर्धन, कृषी सर्व यंत्रणा श्री. गायकवाड यांच्यापर्यंत पोहचल्या. 
पशूसंवर्धन विभागाने प्रयत्नपूर्वक एक बैल उपलब्ध करून घेतला आणि तो जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड, तहसिलदार सोमनाथ वाडकर यांच्यासह पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी आदींच्या उपस्थितीत थेट गायकवाड कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला. यामुळे काशिनाथ गायकवाड यांच्यासर, त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी तातडीने दखल घेत, बैल मिळवून दिल्याने गायकवाड यांच्या पत्नी सौ. हौसाबाई आणि मुलगा पुंडलिक यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह, जिल्हा प्रशासनाचेही आभार मानले. सौ. हौसाबाई म्हणाल्या, आमच्या एका बैलाचा वीज पडून मृत्यू झाल्याने दुर्दैवाने आमच्यावर अशी वेळ आली. पण आमच्या अडचणीची दखल घेऊन, लगेचच मदत मिळाल्याने बरे वाटले. आता पुढे येणाऱ्या खरीप हंगामासाठी मिळालेली कामे पूर्ण करण्याची चिंता दूर झाली. बैल पण चांगला मिळाला आहे. आता त्याची पण चागंली काळजी घेऊ आणि मिळालेली कामे देखील चांगली होतील असे बघू. 

नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावरांचा मृत्यू झाल्यास राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तातडीने अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. श्री. गायकवाड यांच्या दगावलेल्या बैलाचा तातडीने पंचनामा आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून नियमानूसार आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. ही रक्कम श्री. गायकवाड यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. 


****

Monday, June 8, 2026

वन आणि मृदा व जलसंधारण प्रशासनाच्या सीमा वादात फसले धरणाचे गाळमुक्त धोरण. गोरसेनेची वन प्रशासनाची हद्द ठरविण्याची मागणी.


मानोरा: (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क )
गिरोली वनवर्तुळातील सावरगांव कान्होबा येथील धरणातील जमीन वनविभागाची की मृदा व जलसंधारण विभागाची यावरून दोन्ही विभागात ३५ वर्षांपासून प्रशासकीय वाद सुरू आहे. यामुळे धरणात जमा झालेला गाळ काढण्यास शेतकऱ्यांना मज्जाव करण्यात येत आहे. 
परिणामी सुमारे हजार एकर शेती सिंचित करणाऱ्या या धरणाची पाणी साठवण क्षमता गाळाने भरल्याने घटली आहे. शासनाची "गाळमुक्त धरण, जलयुक्त शिवार" योजना असतानाही प्रशासकीय वादामुळे सावरगांव धरण योजनेपासून वंचित राहिले आहे. 
गोरसेना सामाजिक संघटनेचे जि. उपाध्यक्ष गोपाल कनिराम चव्हाण, तालुकाध्यक्ष सुनील राठोड, तालुका सहसंयोजक डॉ.सुधाकर राठोड आणि सचिन जाधव यांनी आज आपदा नियंत्रण प्राधिकारी तथा तहसीलदार राजेंद्र पाटील यांना निवेदन देऊन दोन्ही विभागांची संयुक्त मोजणी करून हद्द कायम करण्याची मागणी केली. 
हद्द निश्चित झाल्यास धरणातील गाळ निघून जलसाठा वाढेल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे. 
प्रत पालकमंत्री, वनमंत्री, जलसंधारण मंत्री व जिल्हाधिकारी यांनाही पाठवण्यात आली आहे.

चौकट --
गाळमुक्त धरण या शासकीय योजनेला वन विभागाच्या आडमूठ्या धोरणामुळे आडकाठी निर्माण केल्या जात आहे. जी तालुका आपदा नियंत्रण प्राधिकरणाने समन्वयाने सोडवावी अन्यथा मंगरूळनाथ व मानोरा तालुक्यातील शेतकरी हितासाठी संघटनेकडून उग्र आंदोलन उभारले जाईल अशी माहिती संघटना पदाधिकारी गोपाल चव्हाण, सुनील राठोड आणि डॉ. मधुकर राठोड यांच्या वतीने देण्यात आली.


फॉलोअर