"नाईक साहेब हे धोरणी राजकारणी होते. लोकशाही मूल्यांवर त्यांचे निस्सीम प्रेम होते. त्यांच्या राजकारणात सांविधानिक मूल्येच केंद्रस्थानी होती. त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या तब्बल एका तपाच्या कार्यकाळात महाराष्ट्रावर अनेक दुर्धर संकटे आली असतानाही त्यांनी महाराष्ट्राची नौका सुखरूपपणे पैलतिरी नेली" असे प्रतिपादन डॉ. प्रकाश खरात यांनी केले. ते अ. भा. तांडा सुधार समिती द्वारा आयोजित महानायक वसंतराव नाईक स्मृतिदिन आणि पद्मश्री रामसिंगजी भानावत यांच्या जयंतिप्रीत्यर्थ 'नाईक साहेबांच्या ध्येयातील महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे वर्तमान' या विषयावरील व्याख्यानात वक्ते म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश राठोड यांनी "महानायक वसंतराव नाईक आणि पद्मश्री रामसिंगजी भानावत हे पुरोगामी विचाराचे नेते होते. पुरोगामी विचाराशिवाय बंजारा आणि सर्वच अभावग्रस्त लोकसमूहांना पर्याय नाही याची त्यांना गंभीर जाण होती. परंतु अलीकडे साधनवंचित लोकसमूहांमधील स्वार्थांध लोकांना हाताशी धरून या नेत्यांचे पुरोगामित्व नष्ट करण्याचे प्रयत्न केले जात आहेत" असे सडेतोड विचार त्यांनी मांडले. प्रमुख अतिथी प्रा. मोहन चव्हाण यांनीही वर्तमान प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर नाईक साहेब आणि पद्मश्री रामसिंगजी भानावत यांच्या विचाराची मौलिकता पटवून दिली.
कार्यक्रमात समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि प्रशासनकुशल अधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामा बंजारा यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ताराचंद चव्हाण व प्रा. सरदार राठोड यांनी केले तर डॉ. विष्णू चव्हाण यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला डॉ. सर्जनादित्य मनोहर, नायक आत्माराम चव्हाण, प्रा. डी. बी. चव्हाण, प्रा. वसंत पवार, रजनी संबोधी, सुधीर जाधव, बद्रीप्रसाद चव्हाण, सुभाष चव्हाण, निलिंद जगताप, शंकर राठोड, जयसिंग जाधव, पिरूसिंग नायक, दिलीप अमरसिंग राठोड, दयाराम राठोड शेरे, सगने, महिन्द्रे, संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment