यवतमाळ, दि. १३ जून २०२५ : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
महावितरण अमरावती परिमंडळाने वीज ग्राहकांच्या समस्या थेट ऐकून घेण्यासाठी आणि त्याचे तात्काळ निराकरण करण्यासाठी एक लोकाभिमुख पाऊल उचलले आहे. लोकशाही दिनाच्या धर्तीवर अमरावती परिमंडळात आता "ऊर्जामित्र दिन" साजरा करण्यात येणार असून,या उपक्रमाच्या माध्यमातून वीज सेवा अधिक पारदर्शक, उत्तरदायी व लोकाभिमुख होईल, असा विश्वास महावितरणचे मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी व्यक्त केला आहे.
या उपक्रमाअंतर्गत, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी महावितरणच्या सर्व उपविभागांमध्ये उपकार्यकारी अभियंता यांच्या प्रमुख उपस्थितीत "ऊर्जामित्र दिन" आयोजित केला जाणार आहे. या दिवशी महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा थेट ग्राहकांशी संवाद होईल, वीज पुरवठ्याशी संबंधित ग्राहकांच्या तक्रारी, सूचना , अपेक्षा आणि अभिप्राय स्विकारल्या जाईल आणि ते निवारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.
अधीक्षक अभियंता प्रविण दरोली यांच्या मार्गदर्शनात आणि कार्यकारी अभियंता यांच्या देखरेखखाली होणाऱ्या "ऊर्जामित्र दिनात " सहभागी होण्यासाठी ग्राहकांनी आपली तक्रार आपल्या संबंधित उपविभागात त्या- त्या महिन्याच्या शेवटच्या तारीखेपर्यंत नोंदणी करावी,जेणेकरून पुढील आठ ते दहा दिवसात महावितरणला प्राप्त झालेल्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी वेळ मिळेल आणि ग्राहकांना त्याबाबत योग्य माहिती देता येईल. तसेच "ऊर्जामित्र दिनाचे " आयोजन त्या दिवसी सकाळी ११ ते १२ वाजेदरम्यान संबंधित उपविभागीय कार्यालयात करण्यात येणार आहे. तथापि प्राप्त सर्व तक्रारी एैकून घेत त्या तक्रारीची दखल घेतल्या जाणार आहे.
ऊर्जामित्र दिनामुळे ग्राहक आणि महावितरण यांच्यातील संवाद अधिक खुला व विश्वासार्ह होईल, तसेच सेवा सुधारण्यास हातभार लागेल. उपक्रमाची अमंलबजावणी यशस्वी होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्राहक प्रतिनिधी, वीज ग्राहक यांचा सक्रीय सहभाग अपेक्षित असून "ऊर्जामित्र दिन "ही एक अभिनव संकल्पना ठरणार आहे.
No comments:
Post a Comment