मानोरा तालुका : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
मौजा वरोली येथील शेतकरी संजय विठ्ठल आप्पा तोरकडी यांच्या गट क्रमांक 44/1 मधील तब्बल दोन हेक्टर क्षेत्र हुमणीच्या प्रादुर्भावामुळे पूर्णपणे नष्ट झाले आहे. शेतकरी तोरकडी यांनी याबाबत तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधला असता संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी “आमच्याकडे कुठलाही आदेश नाही” असे सांगून जबाबदारी झटकली.
शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान होऊनही कृषी विभागाने याकडे गंभीरतेने लक्ष न दिल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सरकारकडून पिकविमा, मदत, आणि नुकसानभरपाईच्या आश्वासनांचा गजर केला जातो; पण प्रत्यक्षात शेतकऱ्याला संकटाच्या काळात कोणीही आधार देत नाही, अशी परिस्थिती या घटनेतून स्पष्ट झाली आहे.
हुमणीच्या आक्रमणाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना कृषी अधिकारी पंचनामे करण्याऐवजी आदेश नाहीत असे सांगत असल्याने शासनाच्या यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
“नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी. अन्यथा शेतकरी वर्ग अधिकच हवालदिल होईल”, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
No comments:
Post a Comment