---------------------------
*काल दिनांक १५ सप्टेबर रोजी जालना आणि बीड शहरात स्वंयस्फूर्तपणे निघालेल्या मोर्चाने समाजाला एक नवी ऊर्जा, नवी चेतना, नवी शक्ती दिलेली आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निघालेले दोन्ही मोर्चे समाजाला प्रचंड बळ आणि प्रेरणा देणारे होते. त्यामुळे जालना आणि बीड येथील तमाम कार्यकर्त्यांचे आणि मोठ्या संख्येने मोर्चात स्वयंस्फूर्तपणे सहभागी होणाऱ्या सर्व समाज बांधवांचे, त्यातल्यात्यात माता- भागिनींचे, युवकांचे विशेष अभिनंदन.*
काल बीड येथे बंजारेत्तर वंजारी पुढाऱ्यांनी जे बोलायला नको होते ते बोललेले आहेत. या घटनेबद्दल संशयाची सुई विशेष करुन श्री उत्तम चव्हाण, प्रा. पी.टी. चव्हाण आणि श्री रविकांत राठोड यांच्याकडे फिरत होती, पण अधिक माहिती घेता यात या तिघांची कोणतीही भूमिका नसल्याचे कळते. ज्या कार्यकर्त्यांनी ही चुक केली आहे त्याची माहिती मिळालेली आहे. त्याला निश्चितपणे समज व ताकीद देण्यात येईल. तुर्त या घटनेबद्दल अधिक चर्चा करणे थांबवावे. याला जास्त रंग द्यायचे नाही. सोशियल मीडियावर संबंधित नेत्यांबद्दल आक्षेपाहार्य पोस्ट, व्हिडिओ टाकणे बंद करावे. समाजातील विचारवंतांनी, साहित्यकांनी बंजारा - वंजारी एक नसल्याबाबतचे लेख जरुर लिहावेत. पण समाज आपल्या लक्ष्यापासून तसुभरही दूर जाणार नाही याची काळजी घ्यावी. यापुढे राज्यात जेथे जेथे मोर्चे आयोजित होतील तेथे कोणीही बंजारेत्तर समाजाच्या पुढाऱ्यांना बोलावू नये. याची सर्वांनी काळजी घ्यावी. या घटनेपासून सर्वांनी बोध घ्यावा.
*सन्माननीय हरिभाऊ राठोड आणि दिगंबर राठोड यांनी या आंदोलनापासून दूर रहावे*
तांड्यापासून ते बांध्यापर्यंत जागा झालेल्या बंजारा समाजाच्या पदरी कांही तरी पडावे असे वाटत असेल तर या दोन सन्माननीय वरिष्ठ मंडळीनी स्वतःहुन ST आरक्षणाच्या लढयापासून चार हात दूर रहावे. त्याचे कारण उसे की, सन्माननीय हरिभाऊ राठोड यांनी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे केंद्रातील सरकार पाडल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. आणि दुसरे असे की, दिगंबर राठोड हे बामसेफ संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. ही संघटना हिंदू धर्माला विरोध करणारी आहे. त्यामुळे हे दोन मान्यवर जर या लढयात राहिले तर फायदा होण्यापेक्षा नुकसान होऊ शकते. त्याचे कारण असे आहे की, सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपामिश्रीत हिंदुत्ववादी विचारधारेचे सरकार आहे. असे लोक या लढयात राहिले तर आरक्षण तर खुप दूरची गोष्ट आहे, सरकार साधी चर्चा ही करणार नाही. याकरीता या मान्यवरांनी स्वघरी शांत बसण्याची भूमिका घेणे समाजहिताचे ठरेल. त्यांनी गैरसमज करुन घेऊ नये. मोर्चा आयोजकांनी सुद्धा याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.
*श्री रामेश्वर भाऊंना सोबत घ्यावे*
नुसते मोर्चे काढून उपयोग होणार नाही. सरकारबरोबर चर्चा घडणे सुद्धा आवश्यक आहे. सरकार, आपले मंत्री, आमदार आणि समाज यांच्यात सेतू म्हणून श्री रामेश्वर भाऊ चोख भूमिका पार पाडू शकतात. म्हणून त्यांना सरकार आणि समाज यांच्यातील एक दुवा म्हणून सोबत घेण्यास हरकत नाही असे मला वाटते.
*समितीचा घोळ*
विविध ठिकाणी वेगवेगळ्या समितीच्या नावाने सध्या मोर्चे निघत आहेत. राज्य स्तरीय एक कृती समिती गठित करण्यात आलेली आहे पण ती अजून कार्यरत झालेली नाही. सरकारला पोषक अशा विचारधारेची कृती समिती असणे आवश्यक आहे. जोपर्यंत वरच्या पातळीवर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत *सकल बंजारा समाज* या नावानेच मोर्चे आयोजित करण्यात यावेत. हे नाव समर्पक आणि सर्वसमावेशक आहे. जे लोक इतर नावाचा आग्रह धरतील त्यांना हे विचारा की, सरकार तुम्हाला चर्चेसाठी बोलावणार आहे का ? जर ते हो म्हणाले तर त्यांच्याकडून लेखी घ्या. आपण त्यांना पुढे करु या. जर त्यांच्यात ती पात्रता नसेल तर जे सरकारबरोबर चर्चा घडवून आणू शकतात किंवा चर्चा करु शकतात त्यांचे ऐका. मोर्चाचा उद्देश सरकारने आपली दखल घेतली पाहिजे हा आहे. त्याकरीता एकाच नावाने समाजाने एकजुट दाखवणे आवश्यक आहे. कांही मंडळी समितीच्या नावासाठी आडमुठेपणाची भूमिका घेत आहेत. म्हणून यापुढे समाज एकजुटीसाठी फक्त *सकल बंजारा समाज* याच नावानेच मोर्चे काढले जावेत.
सध्या समाज ज्या ताकदीने रस्त्यावर उतरलेला आहे त्याला योग्य दिशा आपल्याला द्यायची आहे. त्यामुळे निर्धाराने पुढे जाऊ या. योग्य मार्गाचा उपयोग करु या.
दिनांक : १६/९/२०२५
*फुलसिंग जाधव*
सामाजिक कार्यकर्ता
छत्रपती संभाजीनगर
संपर्क : ८९९९०९८२६५
-------------------------
No comments:
Post a Comment