नागपूर : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)
बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी नागपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने दि. १९ सप्टेंबर २०२५ रोजी नागपूरच्या संविधान चौकात सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेत ‘धरणे आंदोलन’ आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनात नागपूर शहर व जिल्ह्यातील तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यांतील आणि संपूर्ण विदर्भातील बंजारा समाजबांधव व भगिनींनी एक दिवसाची रजा घेऊन उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन नागपूर जिल्हा कृती समितीकडून करण्यात आले आहे.
समाजाच्या हितासाठी व भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असून “बुंद-बुंद से भरता है तालाब” या उक्तीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचे योगदान लाख मोलाचे असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.
“आंदोलनात भरपूर लोकं तर येणार आहेत; मी एकटा नाही गेलो तर काय फरक पडेल” ही मनोवृत्ती बाजूला ठेवून, वैयक्तिक कामे थोडा वेळ बाजूला सारून बंजारा समाजाच्या भल्यासाठी या आंदोलनात सहभागी होणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
संविधान चौकात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून आपली ताकद शासनास दाखवावी आणि आरक्षणाच्या मागणीसाठी एक विराट सेतू बांधावा, असे आवाहन बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे.
‘येताय ना मग, यायलाच पाहिजे’, असा ठाम संदेश देत हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्व समाजबांधवांनी खारीचा वाटा उचलण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
– बंजारा आरक्षण कृती समिती, नागपूर जिल्हा
No comments:
Post a Comment