दिग्रस, ता. ९ सप्टेंबर :( सुरेश चिरडे )
दिग्रस तालुक्यातील कांदळी गावावर शनिवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजविला. काल रात्री (दि. ८ सप्टेंबर) रात्री ८ वाजल्यापासून कोसळणाऱ्या पावसामुळे गावातील तब्बल १८० घरांमध्ये पाणी शिरले. बाधित नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत आश्रय घेतला आहे.
दरम्यान, शेतशिवारातही पाण्याचा प्रचंड तडाखा बसला असून, कपाशी, तूर, सोयाबीनसारखी बहरलेली पिके वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
गावातील नाल्यावर कायमस्वरूपी बांध बांधण्याची आणि पुनर्वसनाची मागणी सन २००० पासून करण्यात येत आहे; मात्र शासनाने अद्यापही दखल घेतली नाही. परिणामी नागरिकांना दरवर्षी पुराच्या पाण्याचा सामना करावा लागत असून, यंदा परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हेक्टरी २० हजार रुपये मदत मिळावी, तसेच बाधित कुटुंबांना त्वरित आर्थिक मदत व पुनर्वसनाची ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
No comments:
Post a Comment