मानोरा (हळदा) (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
संत सेवालाल महाराज जयंतीचे औचित्य साधून ग्राम हळदा येथे दि 8 फेब्रुवारी 2026 आयोजित श्रीमद् भागवत सप्ताहाच्या प्रथम दिवसाच्या कार्यक्रमात ह. भ. प. श्रीराम महाराज यांनी भक्तीचे महत्त्व अत्यंत प्रभावी कथारूपाने विशद केले.
प्रवचनात महाराजांनी भक्तीचे स्वरूप उलगडताना एक प्रेरणादायी प्रसंग सांगितला. आकाशमार्गाने भ्रमण करीत असताना नारद मुनींना एका भयान जंगलातून स्त्रीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. नारद मुनी त्या ठिकाणी उतरले व त्या स्त्रीला तिचा परिचय विचारला. त्यावेळी त्या स्त्रीने सांगितले की, माझा जन्म द्रविड देशात झाला, कर्नाटकात मी वाढले आणि महाराष्ट्रात मला अनेक ठिकाणी सन्मान मिळाला. मला ज्ञान आणि वैराग्य अशी दोन मुले आहेत.
ती स्त्री पुढे सांगते की, मी अनेक ठिकाणी फिरले. ज्या ठिकाणी लोकांनी माझी अवहेलना केली तिथे मी वृद्ध झाले, तर नंदनवनात आल्यावर मी पुन्हा तरुण झाले. मात्र माझी दोन्ही मुले अजूनही अशक्त असून त्यांना मूर्च्छा आलेली आहे. त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी मी आर्ततेने रडत आहे. असे सांगून त्या स्त्रीने आपली व्यथा मांडली.
नारद मुनींनी दोन्ही मुलांना शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न केले; मात्र काहीच उपयोग झाला नाही. त्यावेळी आकाशवाणी झाली— “सत्कर्म, सत्कर्म, सत्कर्म” असा तीन वेळा आवाज झाला. या सत्कर्माचा अर्थ समजून घेण्यासाठी नारद मुनी भ्रमण करीत विविध नगरांत गेले. अखेरीस त्यांची भेट ब्रह्मदेवांचे चार मानसपुत्र—सनक, सनंदन, सनातन व सनकादिक यांच्याशी झाली.
या चौघांनी नारद मुनींना सांगितले की, ज्ञान आणि वैराग्य यांना शुद्धीवर आणण्यासाठी श्रीमद् भागवत कथेचे श्रवण आवश्यक आहे. श्रीमद् भागवत कथेच्या श्रवणाशिवाय ही दोन्ही मुले जागृत होणार नाहीत. अशा प्रकारे भक्ती, ज्ञान व वैराग्य यांचा परस्परसंबंध पहिल्या दिवसाच्या प्रवचनात प्रभावीपणे मांडण्यात आला.
पहिल्या दिवसाच्या या कथाकथनाने भाविक भक्त मंत्रमुग्ध झाले असून पुढील दिवसांच्या भागवत कथेची उत्सुकता वाढली आहे
No comments:
Post a Comment