अमरावती जिल्ह्यातील यावली या गावात ३० एप्रिल १९०९ ला पहाटे एका झोपडीत माय मंजुळेच्या पोटी एक तेजस्वी बाळ जन्माला आले . जेव्हा बाळाचा जन्म झाला तेव्हा अचानक सुसाट्याचा वारा सुटला व झोपडीवरचे छप्पर उडाले . वारा मंजुळामातेला म्हणतो, " मंजुळामाय, जसा मी घरघर करत फिरतो तसा तुझा बाळ घरघर करत फिरेल. हा एका घरात गृहस्थीचा संसार करण्यासाठी नाही आला. विश्व याचा संसार होईल. " सूर्यकिरणे झोपडीत शिरली आणि जणू सूर्यच बोलत आहे , " माय मंजुळा मी जसा विश्वाला प्रकाश देतो आणि अंधार नाहीसा करतो तसाच तुझा बाळ सा-या जगाला प्रकाश दाखविल, अंधार असेल तिथे हा प्रकाश करील . "
वडील बंडोजी इंगळे ठाकूर भट . गणपतराव व तानाबाई आजोबा व आजी. गणपतराव हे पंढरीचे वारकरी होते. बंडूजी शिंप्याचा व्यवसाय करीत. व्यवसाय चालत नसल्याने ते सासरी वरखेड इथे आले.
माणिक हे नाव प्रज्ञाचक्षू बालांध गुलाबराव महाराज यांनी ठेवले. माणिक पहिला व दुसरा वर्ग यावलीत शिकला. तिसऱ्या व चौथ्या वर्गाचे शिक्षण आजोळी वरखेडला घेतले. शाळेत असताना शिक्षणापेक्षा भजन, कीर्तन व गायनात मन रमायचे . माणिकने वरखेडला गुरू आडकोजी यांचे चरणा जवळ बसून आत्मचिंतन सुरू केले. एक दिवस नेहमीप्रमाणे सद्गुरू आडकोजी यांचेसमोर भजन गाताना ' तुका म्हणे ' ही ओळ म्हणत असताना समर्थ म्हणाले," तुका म्हणे नाही तुकड्या म्हणे म्हण " येथून ' तुकड्या म्हणे ' सुरू झाले , आणि तुकडोजींचे भजने असंख्य स्वरूपात प्रकटली .
थोडक्यात जीवन पट - रामटेकच्या जंगलात महाराजांनी तपश्चर्या केली. ' आनंदामृत ' या ग्रंथाचे लिखाण केले. आरती मंडळाची स्थापना केल्यानंतर सालबर्डी येथे भव्य व दिव्य यज्ञ करण्यात आला. या यज्ञाला दहा लाख भाविक व सेवक उपस्थित होते. १९३६ मध्ये स्वातंत्र्य चळवळीचे अर्ध्वर्यू महात्मा गांधी यांचा सहवास त्यांना लाभला. नागठाणा, गुरुकुंज मोझरी, वरखेड, चिमूर येथे प्रतिवर्षी चातुर्मास कार्यक्रम केल्या गेला . चातुर्मासामध्ये चंद्रपूर येथे अटक होऊन चार महिन्यांनी जेलमधून सुटका झाली. गुरुदेव मासिकाचे प्रकाशन आणि सामुदायिक प्रार्थनेचा शुभारंभ तसेच गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना १९४३ मध्ये करण्यात आली . बंगालमधील दुष्काळ निवारणासाठी धान्य गोळा केले, मंदिर खोलो, बलिदान बंदी, नशाबंदी, पंचमहोत्सव , आखाडा संघटन, गोवधबंदी इत्यादी कार्यक्रम गावोगावी राबविले. १९४९ मध्ये भारताचे तत्कालीन महामहीम राष्ट्रपती , देशबंधू डॉ राजेंद्र प्रसाद यांचेकडून ' राष्ट्रसंत ' ही उपाधी मिळाली. सूत कताई यज्ञ, भजन संमेलन, राष्ट्रपती भवन दिल्ली येथे भजन कार्यक्रम, भंडारा जिल्ह्यातील शंभर गावात लालबहादूर शास्त्री यांचे उपस्थितीत ग्रामसुधार कार्यक्रम, भूदान यज्ञात ११,४१० एकर जमीन मिळवली. १९५३ मध्ये पंढरपूर येथे ' ग्रामगीता ' या ग्रंथ लिखाणाला सुरुवात केली. डॉ.राजेंदप्रसाद, डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन, लालबहादूर शास्त्री, जयप्रकाश नारायण, गुलझारीलाल नंदा, इंदिराजी गांधी यांनी गुरुकुंज आश्रमास भेटी दिल्या. देशाचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद हे तर तीन वेळा आश्रमात आले होते. यशवंतराव चव्हाण यांचे समवेत महाराज चीन व पाकिस्तान युद्धाचेवेळी सीमारेषेवर भारतीय जवानांना प्रोत्साहन देण्यासाठी गेले होते.
" आओ चिनियों मैदान में, ए देखो हिंद का हाथ।
तैयार हुआ है, हिंद तुम्हारे साथ।
देखो सिख्खों की ये बाणी । शत्रुका उतरेगा पानी।
गुरगोविंद की फोज है यह, उनकी न चुके फायर निशानी ।"
वंदनीय राष्ट्रसंत हे क्रांतिकारी संत होते. देश व धर्माच्या उत्थानासाठीच महाराजांचा जन्म झाला असावा असे वाटते.
१९६५ मध्ये पाकिस्तानी दुश्मनांना महाराज म्हणतात -
" मेरे प्यारे सुंदर भारतपर, दुष्मनकी नजर ना लगे ।अरे तू सून।
भारत के इस आजादीपर, परदेशी नजर ना लगे । अरे तू सून । "
महाराजांनी अनेक हिंदी, मराठी भजने लिहिली. ग्रामगीता या ग्रंथात विश्वधर्मांचा समन्वय साधला आहे. ग्रामगीता हा ग्रंथ महाराजांनी कष्टकरी शेतकऱ्यास अर्पण केला आहे.
ग्रामाच्या व शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी, विकासासाठी महाराज तळमळत होते. व्यक्ती, कुटुंब, समाज व विश्वधर्माची महाराजांना चिंता होती. महाराजांच्या एकूणच कार्यपद्धती व आचरणपद्धतीवर लोक प्रभावित झाले. तेव्हा महाराज ५१ वर्षांचे झाले होते. सर्वांनी असे ठरवले की, महाराजांचा जन्म दिवस म्हणजे वाढदिवस साजरा करायचा. काही मंडळीनी महाराजांकडे जन्म दिनाच्या निमित्ताने सत्कार समारंभ घेण्याचा प्रस्ताव सादर केला.तेव्हा महाराज म्हणाले, माझा वाढदिवस किंवा जयंती साजरी न करता ग्रामाची जयंती साजरी करा .ग्राम हा भारताचा आत्मा आहे. सुंदर गाव, विकास कामे, सामाजिक सलोखा इत्यादी बाबी करा . सर्व धर्मांना, पंथांना, जातींना महिलांना त्या जयंतीमध्ये सहभागी करून घ्या . विश्वव्यापी होण्याआधी ग्रामव्यापी कसे होता येईल हा विचार करा .
" गाव हा विश्वाचा नकाशा । गावावरुनि देशाचि परीक्षा ।
गावचि भंगता अवदशा । येईल देशा ।। "
आजच्या दिशाहीन मानवी दशेवर व भोंदूगिरी करणा-या साधूंचा महाराजांनी खरपूस समाचार घेतला असता. महाराजांचा साधू संतांच्या चमत्कारावर अजिबात विश्वास नव्हता. ते म्हणतात, लोकांना फसविण्याचे हे खोटे धंदे आहेत. आजही अनेक पोटबैरागी साधू संतांचा चमत्कार लोकांमध्ये पेरतात आणि अडाणी माणसे ( जो अंधश्रद्धेला मानतो तो कोणीही ) भोंदू साधूंच्या चमत्कारिक गोष्टीवर विश्वास ठेवतो.
" भुलु नका हो ! चमत्कारा, जगी ही थापचि सारी ।
लुटति भोंदू अपणाते , दावुनि थोरवी भारी ।।
संत जरि पुत्र हे देती, न मरते लोक पृथ्वीचे ।
निकामी स्वार्थी जन भलत्या, रडोनी सांगती थोरी ।।
संत तोचि जगी जाणा, जयाचे विषय हरी झाले।
म्हणे तुकड्या निजज्ञाने , बोधुनिया जना तारी ।।
- जय गुरू -
No comments:
Post a Comment