मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस):
मानोरा तहसील कार्यालयातील कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून तहसील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तहसीलदार पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तालुक्यातील विटभट्टी धारकांबाबत मंडळ अधिकाऱ्यांकडून पंचनामे करून अहवाल मागविण्याचे आदेश दिल्याची चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात त्यानंतर कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसून येत नसल्याची तक्रार संबंधितांकडून केली जात आहे.
तालुक्यात काही विटभट्टी धारकांनी नियमितपणे रॉयल्टी भरली असून काहींनी मागील दोन वर्षांपासून रॉयल्टीच भरलेली नसल्याचा आरोप आहे. तरीदेखील प्रशासनाकडून सर्वांवर समान निकष लावले जात नसल्याची चर्चा सुरू आहे. "काही अधिकारी तुपाशी तर काही उपाशी" अशी परिस्थिती निर्माण झाल्याने महसूल विभागाच्या कार्यपद्धतीबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
याशिवाय, माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविण्यात आलेल्या माहितीला वेळेवर प्रतिसाद मिळत नसल्याचीही नागरिकांची तक्रार आहे. कार्यालयातील शिस्त आणि अधिकाऱ्यांवरील नियंत्रणाचा अभाव जाणवत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
तालुक्यात गौण खनिजांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असून अनेक वाहने दिवसाढवळ्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप होत आहे. काही प्रकरणांमध्ये कारवाई टाळली जात असल्याचे तर काहींवर लाखो रुपयांचा दंड आकारला जात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कारवाईत दुहेरी निकष लावले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
या सर्व बाबींची जिल्हाधिकारी वाशिम तसेच विभागीय महसूल प्रशासनाने सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे. महसूल प्रशासनातील अनियमितता दूर करून पारदर्शक व न्याय्य कारभार राबविण्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment