मानोरा (प्रतिनिधी): एकेकाळी ज्वारी आणि कापूस उत्पादनासाठी ओळख असलेल्या मानोरा तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून ज्वारीचा पेरा अत्यंत नगण्य झाला आहे. पूर्वी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर ज्वारीची लागवड होत होती. मात्र बदलते हवामान, बाजारपेठेतील परिस्थिती, उत्पादन खर्च आणि आर्थिक गणित यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर आणि कापूस या नगदी पिकांकडे मोठ्या प्रमाणावर मोर्चा वळविला आहे.
यावर्षी अल्पभूधारक शेतकऱ्यांनीही कापूस लागवडीला प्राधान्य दिल्याचे चित्र दिसत आहे. मात्र ज्वारीचा पेरा जवळपास नाहीसा झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, उन्हाळी हंगामातही ज्वारीची लागवड फारशी दिसून येत नसल्याने या पारंपरिक पिकाच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
ज्वारी हे कमी पाण्यावर येणारे, पोषणमूल्यांनी समृद्ध आणि ग्रामीण भागातील प्रमुख अन्नधान्य पीक मानले जाते. तरीही उत्पादनाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने आणि बाजारपेठेत मागणी कमी असल्याने शेतकरी या पिकापासून दूर जात आहेत. दुसरीकडे सोयाबीन, तूर आणि कापूस या पिकांमधून तुलनेने अधिक आर्थिक परतावा मिळण्याची अपेक्षा असल्याने त्यांचा पेरा सातत्याने वाढत आहे.
कृषी तज्ज्ञांच्या मते, ज्वारीसारख्या भरड धान्य पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हमीभाव, प्रभावी खरेदी व्यवस्था, प्रक्रिया उद्योग आणि जनजागृतीची आवश्यकता आहे. अन्यथा मानोरा तालुक्यातून ज्वारीचे पीक पूर्णपणे इतिहासजमा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
No comments:
Post a Comment