मानोरा : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस मानोरा)ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या समस्या व तक्रारींच्या निवारणासाठी वारंवार पंचायत समिती कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, तसेच प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा वेळेत आणि प्रभावीपणे निपटारा व्हावा, या उद्देशाने मानोरा पंचायत समितीमध्ये ‘सह नियंत्रण कक्ष’ गठित करण्यात आला आहे. गटविकास अधिकारी ज्योती राजपुरोहित यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
मानोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय योजना, ग्रामपंचायत स्तरावरील कामे, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, घरकुल, रोजगार हमी योजना, कृषीविषयक बाबी तसेच इतर विकासकामांशी संबंधित समस्या उद्भवत असतात. या तक्रारींचे योग्य पद्धतीने संकलन करून संबंधित विभागाकडून त्यांचा निपटारा करून घेण्यासाठी पंचायत समिती प्रशासनाने ही यंत्रणा उभारली आहे.
आठ सर्कलसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
तालुक्यातील आठ जिल्हा परिषद सर्कलनिहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, संबंधित भागातील नागरिकांच्या तक्रारींचे संकलन, त्यांचा पाठपुरावा आणि निवारणाची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे तक्रारी संबंधित यंत्रणेपर्यंत जलदगतीने पोहोचण्यास मदत होणार आहे.
तक्रारींच्या निवारणासाठी स्वतंत्र पाठपुरावा
सह नियंत्रण कक्षामार्फत प्राप्त तक्रारींची नोंद घेऊन त्या संबंधित अधिकारी व विभागाकडे पाठविण्यात येतील. त्यानंतर तक्रारीच्या निवारणासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्यामुळे ‘तक्रार आली की ती निकाली काढायची’ या भूमिकेतून पंचायत समिती प्रशासन काम करणार असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गटविकास अधिकारी ज्योती राजपुरोहित यांच्या या उपक्रमामुळे पंचायत समिती प्रशासन आणि ग्रामीण नागरिक यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
चौकट :
“तक्रार निवारणाला मिळणार गती”
सह नियंत्रण कक्ष आणि सर्कलनिहाय नोडल अधिकाऱ्यांमुळे नागरिकांच्या तक्रारींचे योग्य संकलन, संबंधित विभागाकडे पाठविणे आणि त्याचा पाठपुरावा करणे सुलभ होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment