दिग्रस : ( साप्ता. दिग्रस एक्सप्रेस)
समाजसेवा, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्राध्यापिका तथा उत्तम समाजसेविका सौ. उज्वला महेंद्र मानकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ‘वादळवारा पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले. भीमकवी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त मुजीबभाई मित्र मंडळ, नांदेडच्या वतीने आयोजित ‘गीत वामनदादांचे’ या विशेष कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला.
शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, नांदेड येथे रविवारी (दि. २३ ऑगस्ट) झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात संत बाबा बलविंदर सिंघजी, गुरुद्वारा लंगर साहेबचे बाबा सुबेकसिंघजी व भंतेजी यांच्या शुभहस्ते उज्वला मानकर यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी मंत्रालयाचे अपर सचिव सुभाषजी वकनखेडे, संस्थापक अध्यक्ष सय्यद मुजीबभाई, इंजि. हरजिंदर सिंघ संधू यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
साहित्य, संस्कृती, समता आणि मानवता या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात वामनदादांच्या गीत-विचार आणि संघर्षमय सामाजिक वाटचालीला उजाळा देण्यात आला. समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या मानकर यांच्या योगदानाचा गौरव हा केवळ व्यक्तीचा सन्मान नसून परिवर्तनवादी सामाजिक चळवळीला दिलेली सलामी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
मुजीबभाई मित्र मंडळाच्या वतीने मानकर यांच्या सामाजिक बांधिलकी, उल्लेखनीय कार्य आणि समाजाला प्रेरणा देणाऱ्या वाटचालीची विशेष दखल घेत त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. पुरस्कार मिळाल्याबद्दल उज्वला मानकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
No comments:
Post a Comment