मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) - भारतातील माळवा प्रदेशाच्या तत्त्वज्ञानी आणि न्यायप्रिय महाराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुनश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती मानोरा येथे ३१ मे रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. पंचायत समितीच्या आवारात दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती, तालुका धनगर समाज संघटना व मल्हार युवा सेना यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस निरीक्षक प्रवीण शिंदे होते. प्रमुख अतिथी म्हणून बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) राजू गुल्हाने, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष विनोद राठोड, डॉ. ललित हेडा, अभिजित राठोड, प्रा. सुनिल काळे, विजय अनंतकुमार पाटील, वासुदेवराव खोंड, वासुदेव काजळे तसेच तालुक्यातील अनेक राजकीय नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी प्रतिमा पूजन व पुष्प अर्पण केले. यावेळी डॉ. ललित हेडा, अभिजीत राठोड, राजू गुल्हाने, डॉ. संजय रोठे व ठाणेदार प्रवीण शिंदे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन माणिक डेरे यांनी केले, तर देवेंद्र कानोडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची कारकीर्द
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी १७६७ ते १७९५ या काळात राज्यकारभार केला. नर्मदा नदीच्या तीरी इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर येथे त्यांनी आपली राजधानी हलवली. प्रशासकीय कामात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या समतेच्या विचारातून आपण बंधुभाव वाढवावा, असे प्रतिपादन यावेळी ठाणेदार प्रवीण शिंदे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगदान
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती, तालुका धनगर समाज संघटना आणि मल्हार युवा सेना यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.
No comments:
Post a Comment