वाशिम, दि.२९ सप्टेंबर (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) शेतकऱ्यांचे उत्पादनक्षमता वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कृषी समृद्धी योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय समितीची सभा आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
या बैठकीत योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा, कृषी उपसंचालक हिना शेख, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, कृषी विकास अधिकारी अभिजीत देवगिरकर, रेशीम विकास अधिकारी सुनील फडके, जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी बोथीकर, मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त प्रियंका झोड, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अरुण यादगिरे,मुख्यमंत्री फेलो संकेत नरुटे आदी उपस्थित होते.
कृषि समृध्दी योजनेची तीन भागात विभागणी व उपलब्ध होणारा निधीमध्ये मागणीवर आधारित योजना, जिल्हा निधी, राज्यस्तरीय प्रकल्प, संशोधन आणि बळकटीकरण, शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, जलसंधारण उपाययोजना, ठिबक सिंचन, पिक विविधीकरण, शेतकऱ्यांच्या स्थानिक गरजा समस्या प्रादेशिक वैशिष्ट्यानुसार उपाययोजना व प्राधान्यक्रम, तालुका निहाय मागणीवर आधारित आराखडा सन २०२५-२६, जिल्हास्तर नियोजित आराखडा,वैरण विकास प्रकल्प, गोदाम सामूहिक शेततळे , प्रात्यक्षिक, कृषी संशोधन केंद्र, चिया हळद पीक बीजोत्पादन, लागवड, मत्स्यव्यवसाय, गोदाम बांधकाम,गोदामाचे व्यवस्थापन, वापर, शेततळ्यांचे प्रस्ताव, मत्स्य तळ्यांमध्ये रूपांतरीकरण आणि नवीन मत्स्य तलाव बांधणी तसेच मूल्यवर्धन प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ पोहोचवणे हीच खरी उद्दिष्टपूर्ती आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्रितपणे समन्वय साधावा व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय प्रभावीपणे अंमलात आणावेत. पुढील हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या गरजेनुसार प्रस्ताव तयार करून सादर करावेत.
माहितीचे सादरीकरण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा यांनी केले. बैठकीस कृषी विभाग, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय,खादी ग्रामोद्योग, रेशीम व तालुका कृषी अधिकारी (दुरदृश्यप्रणालीव्दारे) अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment