मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) – मौजे चिखली, गलमगाव व देऊरवाडी गावाला गव्हा उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. मात्र, थोडा पाऊस झाला किंवा हवामान बदलले तरी या तिन्ही गावांचा वीजपुरवठा वारंवार खंडित केला जातो. परिणामी ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
गावांमध्ये रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे मलेरिया, टायफॉईडसह इतर साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच वीज नसल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होतो. परिणामी नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ येत आहे.
ग्रामस्थांनी उपकार्यकारी अभियंता, विद्युत वितरण कंपनी, मानोरा शाखेला निवेदन देऊन तातडीने दुरुस्ती करून गावांमधील वीजेचा लपंडाव थांबवावा अशी मागणी केली आहे. कुठेही वायरिंग अथवा तार नादुरुस्त असल्यास तत्काळ दुरुस्ती करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, समस्या न सोडविल्यास या तिन्ही गावांतील नागरिक विज कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढतील अथवा उपोषणास बसतील असा इशारा देण्यात आला आहे. यासंबंधी होणाऱ्या आंदोलनास व परिस्थितीस संबंधित अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment