मानोरा (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क )
दगडात देव पाहत नाही आम्ही, माणसांची करतो आरती, रंजल्या गांजल्यांच्या सेवेस कर आमुचे सरसावती... सदा मानव सेवेला देह झिजू दे, घडू दे हरी आता हेचि घडू दे... या भावनेतून मानव सेवेचा सच्चा अर्थ जपणारा एक उपक्रम आज साखरडोह गावात पार पडला.
ग्रामपंचायत साखरडोहचे ग्रामपंचायत अधिकारी श्री. सुरेश पाटील गावंडे व त्यांची धर्मपत्नी सौ. अर्चनाताई सुरेश गावंडे यांनी भाऊबीज निमित्त गावातील २५ विधवा व निराश्रित महिलांना माहेरची साडी-चोळी व फराळ देऊन भावनिक भाऊबीज साजरी केली.
भाऊबीज हा प्रेम, स्नेह आणि कृतज्ञतेचा सण असला तरी समाजातील काही विधवा व निराश्रित महिला या सणापासून वंचित राहतात. त्यांचे एकटेपण दूर करून त्यांना आपलेपणाची ऊब देण्याच्या हेतूने गावंडे दाम्पत्याने हा उपक्रम हाती घेतला. त्यांच्या या कार्यामुळे गावात एक सुंदर सामाजिक संदेश पसरला.
चिखलागड गावचे रहिवासी आणि राज्य शासनाचा सन २०१९-२० चा आदर्श ग्रामसेवक पुरस्कारप्राप्त श्री. सुरेश पाटील गावंडे हे दरवर्षी आपल्या उत्पन्नातील १०% हिस्सा सामाजिक व धार्मिक कार्यावर खर्च करतात. समाजातील वंचित घटकांसाठी सतत कार्यरत राहणारे हे दाम्पत्य गावातील सामाजिक उपक्रमांत नेहमीच आघाडीवर असते.
या भावनिक सोहळ्याला त्यांच्या सुपुत्र स्वराज व सुपुत्री सायली यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते गणेश भोयर, जनार्दन आगुलदरे, ग्रामपंचायत कर्मचारी उमेश चव्हाण, संजीव भगत, विजय भगत, केंद्र चालक सौ. रेखा मिलिंद पखाले व विशाल भारसाखळे उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विधवा व निराश्रित महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य खुलले. समाजात सन्मान आणि आदर मिळवून देणाऱ्या या कार्याने “Service To Man Is Service To God” या विचाराला प्रत्यक्षात उतरवले.
No comments:
Post a Comment