छत्रपती संभाजीनगर (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) — महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक साहेबांनी राज्यात कृषी क्षेत्रात मूलगामी सुधारणा करून शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवले. हरित व धवल क्रांतीद्वारे महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत सक्षम आणि समृद्ध केले. समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी शिक्षणाचा प्रसार-प्रचार केला आणि विशेषतः आदिवासी व वंचित विद्यार्थ्यांसाठी निवासी आश्रमशाळांची उभारणी केली.
पाणी आडवा–पाणी जिरवा ही महत्वाकांक्षी योजना तसेच रोजगार हमी योजनेद्वारे ग्रामीण जनतेच्या हाताला काम देऊन त्यांना आर्थिक बळकटी दिली. या सर्व कार्यामुळे वसंतराव नाईक हे “आधुनिक भारताचे कृषिसंत” असल्याचे गौरवोद्गार प्राचार्य डॉ. संजय शिंदे यांनी काढले.
ते वसंतराव नाईक महाविद्यालयात ५ डिसेंबर रोजी आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम संयोजन समिती प्रमुख डॉ. कमलेश महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. चंद्रकांत चोरघडे यांनी मानले.
No comments:
Post a Comment