महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या सदस्यांची मानोरा बाजार समितीला सदिच्छा भेट
मानोरा (प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे विद्यमान सदस्य तथा रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक बापूजी पगार यांनी नुकतीच मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी बाजार समितीमधील शेतकरी, अडते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधून सद्यस्थितीतील शेतीमालाचे भाव आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोठे आणि सचिव मनोज इंगोले यांनी दीपक पगार यांचे स्वागत केले. यावेळी सभापतींनी बाजार समितीच्या कामकाजाची माहिती देत शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध तांत्रिक व आर्थिक अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. यावर बोलताना पगार म्हणाले की, "शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. बाजार समिती आणि शेतकऱ्यांनी मांडलेले प्रश्न मी स्वतः शासन स्तरावर मांडून ते मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन."
कापूस खरेदी धोरणात बदलाची मागणी
यावेळी रयत क्रांती संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष हर्षद देशमुख यांनी दीपक पगार यांना एक सविस्तर निवेदन दिले. शासनाच्या हमीभावाने कापूस खरेदी योजनेत अनेक त्रुटी असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी या धोरणात तातडीने बदल करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
मान्यवरांकडून स्वागत
या प्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, युवा तालुकाध्यक्ष शाम डोळस, मनोज खडसे, कन्हैया ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष रितेश घाडगे पाटील, विनायक पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन दीपक पगार यांचे स्वागत केले. बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या व्यथा मांडल्या.
No comments:
Post a Comment