मानोरा : (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
गोर बंजारा समाजावरील अन्याय-अत्याचाराविरोधात मागील पंचवीस वर्षांपासून राज्यासह संपूर्ण देशभर कार्यरत असलेली गोरसेना ही एकमेव संघटित चळवळ म्हणून ओळखली जाते. गोरसेनेच्या माध्यमातून गोरसेना, गोरशिकवाडी, याडी धरमळी दल, गोर गवळ्या दल अशा विविध विंगद्वारे तांडा-तांड्यावर जनजागृतीचे कार्य सातत्याने केले जाते. संत सेवालाल महाराज, महानायक वसंतरावजी नाईक, क्रांतिसूर्य काशिनाथ नाईक यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाची माहिती देत समाजाच्या चालीरीती, रूढी-परंपरा जपण्याचे कार्य संघटनेतर्फे केले जाते.
गोर गवळ्या दलाच्या वतीने समाजातील पारंपरिक रूढी, रिवाज, खानपान व लोकसंस्कृती जपण्यासाठी कार्यकर्ते तांडो-तांड फिरून संत सेवालाल महाराज मंदिरात लोकगीतांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करीत आहेत.
या पार्श्वभूमीवर गोर गवळ्या दलाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी तालुक्यातील आसोला खुर्द तांडा येथील विजय जाधव यांची निवड झाल्याबद्दल मानोरा येथे बंजारा समाजाच्या वतीने त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी देवठाणा येथील माजी सरपंच रामराव चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते वसंतराव राठोड, गोरसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाल चव्हाण, शेतकरी नेते मनोहर राठोड, गोरसेनेचे जिल्हा सचिव अरविंद चव्हाण, वसंत सेनेचे अध्यक्ष आशिष राठोड, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दुर्योधन जाधव, निलेश राठोड, ग्रामपंचायत सदस्य युवराज जाधव यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना विजय जाधव यांनी सांगितले की, “माझ्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी मोठी असून तिचा प्रामाणिकपणे पाईक म्हणून निभाव करीन. समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा दूर करणे, व्यसनमुक्तीचा संदेश देणे, लग्न समारंभातील अनावश्यक खर्च टाळण्यासाठी जनजागृती करणे तसेच पारंपरिक पेराव व खानपान संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment