कारखेडा (ता. मानोरा) (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
येथे शंकरगिरी महाराज यांच्या 115 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथेचा चौथा दिवस भक्तिभावात पार पडला. यावेळी ह.भ.प. बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर यांनी “राम कथा” या विषयावर प्रभावी प्रवचन करून उपस्थितांना जीवनमूल्यांचा संदेश दिला.
रामायण मधील आदर्शांचे चिंतन
महाराजांनी सांगितले की, “आई-वडिलांचे वचन हे शंभर तीर्थांपेक्षा पवित्र असते.” श्रीरामांनी पित्याचे वचन पाळण्यासाठी कोणतीही तक्रार न करता १४ वर्षांचा वनवास स्वीकारला. राज्यसुख, ऐश्वर्य आणि वैभवाचा त्याग करून त्यांनी कर्तव्य, आज्ञापालन आणि धर्मनिष्ठेचा आदर्श घालून दिला. मुलांनीही आई-वडिलांचा सन्मान, सेवा आणि त्यांच्या शब्दाला मान देणे हेच खरे धर्मपालन असल्याचा संदेश त्यांनी दिला.
सीतेने राजवैभवाचा त्याग करून “पती हाच परमेश्वर” मानत रामांसोबत वनवास पत्करला. संकटे, गरिबी आणि कठीण प्रसंगांचा धैर्याने सामना करत तिने पतीव्रतेचा सर्वोच्च आदर्श उभा केला, असे महाराजांनी स्पष्ट केले.
तसेच महाभारतचा संदर्भ देत, मुलांवर योग्य संस्कार झाले नाहीत तर त्याचे परिणाम संपूर्ण कुटुंब व समाजाला भोगावे लागतात, असे सांगण्यात आले. धृतराष्ट्राने आपल्या पुत्रांवर योग्य संस्कार न केल्यामुळेच शंभर कौरवांचा विनाश झाला, या उदाहरणातून पालकांना सजगतेचा उपदेश करण्यात आला.
प्रवचनामुळे वातावरण भक्तिरसाने भारावून गेले होते. कार्यक्रमास ग्रामस्थ व भाविकांची मोठी उपस्थिती होती. कथेचे पुढील दिवसही उत्साहात पार पडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
No comments:
Post a Comment