Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Sunday, March 29, 2026

शेंदूरजना परिसरात आंब्यांचा बहर; गावांना चैतन्य, शेतकऱ्यांना दिलासा

शेंदूरजना (अ) –( अफसर शहा )
सध्या गावागावांत आणि शहरांजवळील बागांमध्ये आंब्याच्या झाडांचा बहर पाहायला मिळत असून परिसराला एक ताजेतवाने, चैतन्यमय रूप प्राप्त झाले आहे. झाडांवर लगबगीने लागलेले हिरवेगार आंबे शेतकरी व शेतमजुरांचे लक्ष वेधून घेत आहेत. अनुकूल हवामानामुळे यावर्षी आंब्याचे भरघोस उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतीकामात व्यस्त असतानाच बागांमधील बहरलेली आंब्याची झाडे त्यांना समाधान देत आहेत. शेतांच्या कडेला व बागांमध्ये वाकलेल्या फांद्यांवर लटकलेले आंबे येत्या काही दिवसांत बाजारपेठा स्थानिक आंब्यांनी गजबजून जाणार असल्याचे संकेत देत आहेत.
शेतकऱ्यांच्या मते, हवामान असेच अनुकूल राहिल्यास आंबे लवकरच पिकून विक्रीसाठी बाजारात येतील. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच शेतमजुरांना आंबे तोडणी, निवड व वाहतूक यांसारख्या कामांमधून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. स्थानिक बाजारपेठांमध्येही आंब्याच्या व्यापाराला गती मिळत असून व्यापाऱ्यांनी खरेदीसाठी तयारी सुरू केली आहे.
उत्तम दर्जाचे आंबे वेळेत मिळावेत यासाठी व्यापारी बागमालकांशी संपर्क साधत आहेत. दरम्यान, ग्रामीण भागातील लहान मुले व तरुणांमध्येही आंब्याबाबत उत्साह दिसून येत आहे. अनेक ठिकाणी कच्च्या आंब्यांपासून लोणची, चटण्या व पन्हे तयार करण्यास सुरुवात झाली आहे.
विशेष म्हणजे, हा परिसर देशी आंब्याच्या रसासाठी प्रसिद्ध आहे. येथील आंब्यांना जिल्ह्यातील विविध गावांमध्ये तसेच यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि नागपूर या शहरांतही मोठी मागणी असून व्यापारी पिकलेले व कच्चे आंबे मोठ्या प्रमाणावर पाठवत आहेत. एकूणच, आंब्याच्या बहरामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून येणारा हंगाम शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या दिलासादायक ठरण्याची अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर