मानोरा (जि. वाशिम) — (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
तालुक्यातील गव्हा येथील गट क्र. १९ व २० मधील शेतजमिनीच्या वादाने तीव्र स्वरूप धारण केले असून, शेतकरी हेडा कुटुंबाने तहसीलदार मानोरा यांच्यावर संगनमत, भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर केल्याचे गंभीर आरोप केले आहेत.
दुर्गाबाई वसंतकुमार हेडा, संदीप वसंतकुमार हेडा, योगिता संदीप हेडा व वसंतकुमार विश्वनाथ हेडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाल्यालगत पूर्वीपासून अस्तित्वात असलेला रस्ता जाणीवपूर्वक नष्ट करून “रुंदीकरण”च्या नावाखाली नवीन रस्ता लादण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रक्रियेत गैरअर्जदार दयाराम रावजी राठोड याने प्रशासनाशी संगनमत केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, तहसीलदारांनी एकतर्फी व मनमानी आदेश देत त्यांच्या शेतीवर परिणाम करणारा निर्णय घेतला. “या निर्णयामुळे आमच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतीयोग्य क्षेत्र कमी झाले आहे. यामागे आर्थिक व्यवहार व दबावाचे राजकारण असल्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे हेडा कुटुंबीयांनी सांगितले.
या प्रकरणात प्रशासनाने वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
हेडा कुटुंबीयांचे प्रमुख आरोप :
नाल्यालगतचा मूळ रस्ता जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आला
खोट्या कारणावरून नवीन रस्ता जबरदस्ती लादला
तहसीलदारांनी पदाचा गैरवापर करून एकतर्फी आदेश दिला
प्रशासनाचा वापर करून शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिक त्रास दिला
संतप्त हेडा कुटुंबीयांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून तहसीलदारांच्या आदेशाला स्थगिती देण्याची, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची व मूळ रस्ता पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, “तात्काळ न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणासारखे तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणामुळे मानोरा तालुक्यात खळबळ उडाली असून, आता वरिष्ठ प्रशासन या आरोपांवर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment