रूई (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क) – “संपत्तीपेक्षा संतती महत्त्वाची आहे” असे प्रतिपादन वैश्विक विकास संस्थेचे अध्यक्ष अजय झरकर यांनी येथे आयोजित सुसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
या शिबिरात राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या सुमारे ५० विद्यार्थ्यांचा सहभाग असून, हे शिबिर १० दिवस चालणार आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांना विविध सामाजिक, नैतिक व व्यक्तिमत्त्व विकासाशी संबंधित विषयांचे प्रशिक्षण दिले जात आहे.
अजय झरकर पुढे म्हणाले की, “आजच्या सोशल मीडियाच्या युगात मोबाईल आणि इंटरनेट आवश्यक असले तरी त्याचा अति वापर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेवर परिणाम करत आहे. त्यामुळे पालकांनी मुलांवर योग्य संस्कार करून त्यांना योग्य दिशा देणे गरजेचे आहे. पैशापेक्षा मुलांचे संस्कार आणि चारित्र्य हेच खरे धन आहे.”
यावेळी त्यांनी पालकांना मुलांवर अति लाड न करता त्यांच्यात सामाजिक, आर्थिक आणि नैतिक मूल्ये रुजवण्याचे आवाहन केले. तसेच आई-वडील, ज्येष्ठ नागरिक यांचा आदर राखण्याची शिकवण देणारी शिबिरे आजच्या काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला पुसद नगर परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य ऋषीभाऊ पंडितकर, विवेकभाऊ बहिष्कार यांच्यासह केसाळे महाराज, रामेश्वर दादा बर्गड, अशोक मामा रंभावळे, विलास राऊत, उत्तम टेलर, चेतन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन समाजप्रबोधनकार पंकज पाल महाराज यांनी केले असून, महाराष्ट्रातील विविध भागांतील मान्यवर या शिबिराला भेट देत आहेत.
No comments:
Post a Comment