Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Tuesday, May 26, 2026

कृषी अभियानांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर कृषी विषयक विविध समित्यांची आढावा बैठक संपन्न


वाशिम, दि. २६ मे (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) : जिल्ह्यात कृषी उत्पादनवाढ, अन्न सुरक्षा बळकटीकरण आणि शेतकरी सक्षमीकरणाच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियान, राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी. कृषी विभागासह विविध यंत्रणांच्या समन्वयातून ही अभियाने यशस्वी करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
या तिन्ही महत्त्वपूर्ण अभियानांच्या सुयोग्य संचलनासाठी आयोजित जिल्हास्तरीय समित्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाहा, आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, कृषी उपसंचालक हिना शेख, कृषी विकास अधिकारी अभिजित देवगीरकर आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानातून कडधान्य घटक स्वतंत्र करून रब्बी हंगामापासून कडधान्य आत्मनिर्भरता अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात कडधान्य लागवड, उत्पादन व उत्पादकता वाढीसाठी वार्षिक कृती आराखडा तयार करण्यात येणार असून शेतकऱ्यांना प्रमाणित बियाण्यांचे वितरण, प्रशिक्षण, शेतकरी शेतीशाळा तसेच कृषी विज्ञान केंद्रामार्फत आद्यरेषीय समूह प्रात्यक्षिके राबविण्यात येणार आहेत. सन २०२६-२७ साठी सलग गट प्रात्यक्षिकांसाठी   नियोजन करण्यात आले असून प्रमाणित बियाणे वितरण, बियाणे उत्पादन, प्रशिक्षण तसेच प्रक्रिया युनिट स्थापनेसाठी विविध घटकांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृषी विभाग, नाबार्ड, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र आणि शेतकरी उत्पादक संस्थांच्या समन्वयावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया अंतर्गत जिल्ह्यात तेलबिया लागवड आणि उत्पादनवाढीसाठी मूल्य साखळी भागीदार निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या समितीमार्फत तेलबिया कृती आराखडा तयार करणे, बी-बियाण्यांच्या मागणीचे नियोजन, पात्र शेतकऱ्यांना बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण व शेतीशाळांचे आयोजन तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था किंवा खाजगी संस्थांची मूल्य साखळी भागीदार म्हणून निवड करण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा, सूक्ष्म सिंचन आणि कृषी पत योजनांशी जोडून उत्पादनक्षमता वाढविण्यावर विशेष भर द्यावा. सुधारित तंत्रज्ञान, सुधारित वाण आणि काढणीनंतरच्या तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांची क्षमता वाढविण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबवावेत, असेही जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी सांगितले.
याशिवाय राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानाच्या सन २०२६-२७ च्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान कार्यकारी समिती गठीत करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत भात, गहू, भरडधान्य (मका) तसेच पौष्टिक तृणधान्यांचा समावेश करण्यात आला असून पीक प्रात्यक्षिके, एकात्मिक अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापन, प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण तसेच कृषी जिल्हा महोत्सवाचा समावेश असलेला आराखडा मंजूर करण्यात आला आहे.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खत, बियाणे व कीडनाशकांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठांचा पुरवठा सुनिश्चित करणे तसेच गुणवत्ता नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना राबविण्यावर बैठकीत भर देण्यात आला. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात एकूण १ लाख ४६ हजार ७६० मे.टन खतांची मागणी नोंदविण्यात आली असून त्यापैकी ७८ हजार ७०० मे.टन खत आवंटनास मंजुरी देण्यात आली आहे. दि. २५ मे २०२६ अखेर १५ हजार ३९२ मे.टन खतांचा प्रत्यक्ष पुरवठा झाला असून विक्रेत्यांकडे ३५ हजार ९७० मे.टन शिल्लक साठा उपलब्ध असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. सोयाबीनसह विविध पिकांसाठी आवश्यक बियाण्यांचा पुरवठा, विक्री व साठा स्थितीचाही आढावा घेण्यात आला. संबंधित यंत्रणांनी शेतकऱ्यांना वेळेत आणि दर्जेदार निविष्ठा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

यावेळी कृषी संबंधित  अधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

फॉलोअर