मानोरा :(साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस) तालुक्यातील कारखेडा, वरोली, रामतिर्थ, सेवादासनगर,देऊरवाडी,चिखली, तळप बु., विठोलीसह परिसरातील गावांमध्ये गेल्या सोमवारपासून दररोज रात्री ७ ते ११ वाजताच्या दरम्यान अघोषित भारनियमन सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून नागरिक आजाराने आणि उकाड्याने त्रस्त झाले आहेत. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कारखेडा ग्रामपंचायत सदस्य बबन नारायणराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी दि. १८ जुलै २०२६ रोजी रात्री ७ वाजताच्या पुढे विज वितरण केंद्राच्या प्रांगणात झोपा आंदोलन केले.
ग्रामपंचायत कार्यालय, कारखेडा यांच्या वतीने मानोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नियमित वीज पुरवठा ही मूलभूत आवश्यकता आहे. यासंदर्भात यापूर्वी १७ जुलै २०२६ रोजी उपकार्यकारी अभियंता, वि.वि.कंपनी, मर्या. उपविभाग मानोरा यांना भारनियमन बंद न केल्यास कार्यालयासमोर झोपा आंदोलन करण्याचे लेखी कळविण्यात आले होते. मात्र भारनियमन बंद झाले नसल्याने शनिवारी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
महावितरणच्या अघोषित भारनियमनामुळे शिक्षणावर परिणाम होत असुन रात्री अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अघोषित लोडशेडिंगमुळे नागरिक विविध आजारांनी ग्रासले आहेत, रात्रीच्या वेळी वीज नसल्याने उकाड्यामुळे झोप लागत नाही. जर शनिवार सायंकाळी देखील भारनियमन घेण्यात आले तर आम्ही विज वितरण केंद्राच्या प्रांगणात झोपा आंदोलन करू. प्रशासनाने तातडीने यावर तोडगा काढावा. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment